Thursday 27 August, 2009

इतिहासावर प्रकाशझोत ‘तेजोगोल’


एका इतिहासावर प्रकाशझोत

आचार्य बाळाराव सावरकर लिखित विविध राजकीय लेखांचा संग्रह ‘तेजोगोल’ या यथोचित शीर्षकासह वीर सावरकर प्रकाशन द्वारा प्रकाशित झाला आहे.

बाळाराव सावरकरांनी सोळा वर्षे स्वा.वीर सावरकरांचे निजीसचिव म्हणून निकटचा सहवास अनुभवला आहे. तेव्हापासून आजपर्यंत सावरकरवादाचे ते अखंड चिंतन करीत आले आहेत. वीर सावरकरांना गुरुस्थानी मानणाऱ्या हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदीही बाळाराव सावरकरांची यावर्षीच निवड झाली आहे.
पुढील पिढयांतील इतिहासकारांना मार्गदर्शक ठरावे असे चार खंडांतील विस्तृत सावरकर चरित्र पूर्ण झाल्यावर सावरकर विचारांच्या चिंतनातून वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या विवडक लेखांचा संग्रह होणे आवश्यक होते. ती आवश्यकता ‘तेजोगोल’ च्या प्रकाशनामुळे काही अंशी पूर्ण झाली आहे.

विविध पैलूंवर प्रकाश

तेजोगोल मध्ये वीर सावरकरांच्या विचारांवर लेख आहेत त्याचप्रमाणे सत्ता, पैसा किंवा विविध दडपणे यांना शरण न जाता स्वा.सावरकरांशी निष्ठावंत राहणाऱ्या त्यांच्या अनुयायांवर बाळाराव सावरकरांनी लिहीलेले लेखही या पुस्तकात समाविष्ट आहेत.

वीर सावरकरांचा सशस्त्र क्रांतिवाद, सुधारकी दृष्टीकोन ,विज्ञाननिष्ठा, हिंदुत्ववाद या विविध पैलुंवर प्रकाश टाकणारे लेख या संग्रहात आहेत.

या पुस्तकातील आमची आर्थिक नीती’ हा लेख वेगळ्या स्वरुपाचा आहे. स्वा.सावरकरांनी अर्थविषयक विचार दिला नाही किंवा हिंदुसभेला आर्थिक धोरण नव्हते वा नाही अशी टिका करणाऱ्यांना लेखकमहोदयांनी "वर्गहितांचा राष्ट्रिय समन्वय" या सूत्राचे विवरण करुन उत्तर दिले आहे.
‘तेजोगोल’ मधील ‘पत्रकार सावरकर’ ,रासबिहारी-सावरकर पत्रव्यवहार’ त्याचप्रमाणे ‘नि:स्वार्थी मित्र गॉय अल्ड्रेड’ हे लेख विशेष उल्लेखनिय वाटतात.

निर्भिड पत्रकार

लोकमान्य टिळक, न.चि.केळकर, काका खाडिलक्लर इ. प्रभावी नेत्यांना पत्रकार म्हणून ओळखले जाते. सावरकर स्वत:ही एक निर्भिड पत्रकार कसे होते व हिंदुत्ववाद्यांची स्वत:ची वृत्तपत्रे (दैनिके) असावित यासाठी ते किती आग्रही होते व त्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले याची माहिती पत्रकार सावरकर या लेखात आहे.

‘रासबिहारी-सावरकर पत्रव्यवहार’ या लेखातून सावरकरांची आंतरराष्ट्रीय राजकारणावर केवढी सूक्ष्म दृष्टी होती हे लक्षात येते. ‘गॉय अल्ड्रेड’ या ब्रिटिश पत्रकाराची भारतीय स्वातंत्र्याविषयीची तळमळ, फाळणीला विरोध तसेच त्यांनी गांधीवादाची केलेली परखड मिमांसा इत्यादी गोष्टींची अद्यापही काहिशी उपेक्षित असलेली माहिती ‘नि:स्वार्थी मित्र गॉय अल्ड्रेड’ या लेखातून मिळते.बाबाराव सावरकर, डॉ. ना.भा. खरे, मसुरकर महाराज, मामाराव दाते यांच्यावरील लेखांतून त्या त्या व्यक्तींच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला आहे. देशभक्ती म्हणजे काही केवळ गांधीवाद नव्हे, ‘हिंदुसभा निवडणुका कशासाठी लढवते?’ या मुलाखतवजा लेखात ,वारंवार अपयश येऊनही हिंदुसभा राजकारणात का उभी आहे याची उत्तरे देण्याचा प्रयत्न आहे.

सावरकर चरित्र

‘तेजोगोल’ मधील अंतिम लेख "वीर सावरकर चरित्र लेखन-अनुभव आणि उद्देश" हा असून बेळगाव येथे स्वा.सावरकर साहित्य अभ्यास मंडळाने आयोजित केलेल्या सावरकर साहित्य संमेलनाचे आचार्य बाळाराव सावरकरांचे अध्यक्षिय भाषण आहे.सावरकरांसारख्या तेजोगोलावर विस्तृत चरित्र लिहीताना त्यांना आलेले बरेवाईट अनुभव, काहिजणांचे सहय्य तर काहींचा विघ्नसंतोषीपणाचा इतिहास या भषणात मांडला आहे. सावरकर विचारांचे व सावरकर वाड्‌ंमयाचे आजही असलेले महत्व व त्याच्या प्रचारासाठी असलेले उपाय यात सांगितले आहेत. एकंदरीतच ‘तेजोगोल’ हा लेखसंग्रह सावरकरी विचारांशी ओळाख करून घेण्यास सर्व लहानथोरांस उपयुक्त ठरेल.


तेजोगोल: बाळाराव सावरकर
प्र. वीर सावरकर प्रकाशन,मुंबई
पृष्ठे २७२

प्रथम प्रकाशन:

२६ जून १९८८ दैनिक तरुण भारत

भ्रष्टाचारी वृत्तीची कहाणी

भ्रष्टाचारी वृत्तीची कहाणी

श्री. ह.मो.मराठे यांची "मार्केट" ही कादंबरी त्यांनी मालक-कामगार संबंधांवर तसेच औद्योगिक पार्श्वभूमीवर रेखाटली असून त्यातून समाजातील भ्रष्टाचार वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मांडणी
कादंबरीचे कथानक बडया कंपनीमधे मार्केटिंग ऑफीसर असलेल्या सुधाकर केळकर व त्यांच्या कुटुंबियांभोवती फिरत राहते.पैसा हीच निष्ठा असलेल्या केळकरांना अन्य तत्व असे काही नाहीच. उलट आपला कार्यभाग साधण्यासाठी आपल्या सहवासात येणार्या प्रत्येक माणसाला ते पैशाचे तत्वज्ञान सांगून भ्रष्टाचारी व भावनाहीन करुन टाकतात. त्यातून त्यांची पत्नी व मुलगीही सुटत नाही. एकप्रकारे केळकर हे पात्र म्हणजे समाजातील स्वार्थलोलूप भ्रष्टाचारी मंडळींचेच प्रतिक झाले आहे.

कथानक अगदी लहान आहे. कामगारांना बोनस म्हणून अर्धे पैसे रोखीने व उरलेले भेटवस्तूच्या स्वरुपात देण्याची योजना बी.वाय.पी. ही कंपनी आखते. पण भेटवस्तू म्हणून देण्यात आलेल्या सुटकेसेस अतिशय हलक्या दर्जाच्या निघतात. या सुटकेसेस केळकरांच्या कंपनीने तयार केलेल्या असतात. या घटनेचा गवगवा होऊ नये म्हणून केळकर बी.वाय.पी. माणूस विकत घेऊन प्रकरण दाबून टाकतात. यात यश येताच प्रत्येक गोष्टीचे ,अगदी अर्काताच्या नात्यांचेही व्यापारीकरण करुन पैसा मिळवण्याच्या मागे केळकर ही व्यक्ती धावत सुटते.त्यांच्या खेळात त्यांची तरुण मुलगी बळी जाते. पण पैसानिष्ठ केळकर तिच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्यांशीही सौदा करतात.

इंग्रजी शब्दांची बजबजपुरी

कथानकाची मांडणी व सूत्र व्यवस्थित असले तरी कादंबरीची आंग्लाळलेली शाषा अयोग्य वाटते. कादंबरीत वातावरण निर्मितीसाठी व कृत्रिमता येऊ नये म्हणून इंग्रजी शब्द वापरण्याची आता रुढीच होत चालली आहे. पण तरिही कादंबरीत असलेली इंग्रजी शब्द व वाक्यांची बजबजपुरी अजिबात समर्थनीय नाही. कादंबरीच्या कथानकात हा मोठाच अडथळा होऊन बसला आहे.ऑफिसला कार्यालय, फोनला दूरध्वनी अशा प्रतिशब्दांची एकवेळ अपेक्षा नसली तरी- "‘ही टोल्ड की दि होल लॉट इज डिफेक्टिव्ह’- अशा स्वरुपाच्या वाक्यरचना अपेक्षित नव्हत्या. हे वाक्य अपवादात्मक नाही तर सर्व कादंबरीत अशीच भाषा मुक्तहस्ते वापरली गेली आहे. वातावरण निर्मितीसाठी (?) इंग्रजी शब्द वापरणारे लेखक महाशय मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रात मोठमोठया पदांवर काम करणारे साठे ,पेंडसे ,जोग ,पुराणिक इ.नावांची मराठी माणसे दाखवतात. यात;आ बोल्डर ‘तोडकर’ नावाचा आहे. संपूर्ण कादंबरीत केवळ एक ‘आहुजा’ नावाचा असून तो केळकरांचाच बळी ठरलेला दाखवला आहे.आजची वस्तुस्थिती सर्वजण जाणतात. त्यामुळे ही विसंगती वाचकांना बोचल्याविना राहणार नाही.

समाजातून नष्ट होत जाणारी तत्वनिष्ठ माणसे किती दुबळ्या हातांची ठरत आहेत ते केळकरांच्या सासऱ्यांच्या व्यक्तीरेखेतून पुरेसे स्पष्ट केले गेले आहे. सामाजिक नीतीमूल्यांच्या ऱ्हासाबरोबरच ढासळती लग्नसंस्था व कुटुंबव्यवस्था यांचे चित्रणही लेखकाने यशस्वीपणे केले आहे. एकूण भाषाशुद्धता व तपशील यांचे दोष वगळता कादंबरी वाचनीय आहे असे म्हणता येईल.

मार्केट: ह.मो.मराठे
प्र.मॅजेस्टिक प्रकाशन,गिरगाव,मुंबई-४
पृष्ठे २०९

प्रथम प्रकाशन:

दै. तरुण भारत ४ सप्टेंबर १९८८