Thursday 27 August, 2009

इतिहासावर प्रकाशझोत ‘तेजोगोल’


एका इतिहासावर प्रकाशझोत

आचार्य बाळाराव सावरकर लिखित विविध राजकीय लेखांचा संग्रह ‘तेजोगोल’ या यथोचित शीर्षकासह वीर सावरकर प्रकाशन द्वारा प्रकाशित झाला आहे.

बाळाराव सावरकरांनी सोळा वर्षे स्वा.वीर सावरकरांचे निजीसचिव म्हणून निकटचा सहवास अनुभवला आहे. तेव्हापासून आजपर्यंत सावरकरवादाचे ते अखंड चिंतन करीत आले आहेत. वीर सावरकरांना गुरुस्थानी मानणाऱ्या हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदीही बाळाराव सावरकरांची यावर्षीच निवड झाली आहे.
पुढील पिढयांतील इतिहासकारांना मार्गदर्शक ठरावे असे चार खंडांतील विस्तृत सावरकर चरित्र पूर्ण झाल्यावर सावरकर विचारांच्या चिंतनातून वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या विवडक लेखांचा संग्रह होणे आवश्यक होते. ती आवश्यकता ‘तेजोगोल’ च्या प्रकाशनामुळे काही अंशी पूर्ण झाली आहे.

विविध पैलूंवर प्रकाश

तेजोगोल मध्ये वीर सावरकरांच्या विचारांवर लेख आहेत त्याचप्रमाणे सत्ता, पैसा किंवा विविध दडपणे यांना शरण न जाता स्वा.सावरकरांशी निष्ठावंत राहणाऱ्या त्यांच्या अनुयायांवर बाळाराव सावरकरांनी लिहीलेले लेखही या पुस्तकात समाविष्ट आहेत.

वीर सावरकरांचा सशस्त्र क्रांतिवाद, सुधारकी दृष्टीकोन ,विज्ञाननिष्ठा, हिंदुत्ववाद या विविध पैलुंवर प्रकाश टाकणारे लेख या संग्रहात आहेत.

या पुस्तकातील आमची आर्थिक नीती’ हा लेख वेगळ्या स्वरुपाचा आहे. स्वा.सावरकरांनी अर्थविषयक विचार दिला नाही किंवा हिंदुसभेला आर्थिक धोरण नव्हते वा नाही अशी टिका करणाऱ्यांना लेखकमहोदयांनी "वर्गहितांचा राष्ट्रिय समन्वय" या सूत्राचे विवरण करुन उत्तर दिले आहे.
‘तेजोगोल’ मधील ‘पत्रकार सावरकर’ ,रासबिहारी-सावरकर पत्रव्यवहार’ त्याचप्रमाणे ‘नि:स्वार्थी मित्र गॉय अल्ड्रेड’ हे लेख विशेष उल्लेखनिय वाटतात.

निर्भिड पत्रकार

लोकमान्य टिळक, न.चि.केळकर, काका खाडिलक्लर इ. प्रभावी नेत्यांना पत्रकार म्हणून ओळखले जाते. सावरकर स्वत:ही एक निर्भिड पत्रकार कसे होते व हिंदुत्ववाद्यांची स्वत:ची वृत्तपत्रे (दैनिके) असावित यासाठी ते किती आग्रही होते व त्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले याची माहिती पत्रकार सावरकर या लेखात आहे.

‘रासबिहारी-सावरकर पत्रव्यवहार’ या लेखातून सावरकरांची आंतरराष्ट्रीय राजकारणावर केवढी सूक्ष्म दृष्टी होती हे लक्षात येते. ‘गॉय अल्ड्रेड’ या ब्रिटिश पत्रकाराची भारतीय स्वातंत्र्याविषयीची तळमळ, फाळणीला विरोध तसेच त्यांनी गांधीवादाची केलेली परखड मिमांसा इत्यादी गोष्टींची अद्यापही काहिशी उपेक्षित असलेली माहिती ‘नि:स्वार्थी मित्र गॉय अल्ड्रेड’ या लेखातून मिळते.बाबाराव सावरकर, डॉ. ना.भा. खरे, मसुरकर महाराज, मामाराव दाते यांच्यावरील लेखांतून त्या त्या व्यक्तींच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला आहे. देशभक्ती म्हणजे काही केवळ गांधीवाद नव्हे, ‘हिंदुसभा निवडणुका कशासाठी लढवते?’ या मुलाखतवजा लेखात ,वारंवार अपयश येऊनही हिंदुसभा राजकारणात का उभी आहे याची उत्तरे देण्याचा प्रयत्न आहे.

सावरकर चरित्र

‘तेजोगोल’ मधील अंतिम लेख "वीर सावरकर चरित्र लेखन-अनुभव आणि उद्देश" हा असून बेळगाव येथे स्वा.सावरकर साहित्य अभ्यास मंडळाने आयोजित केलेल्या सावरकर साहित्य संमेलनाचे आचार्य बाळाराव सावरकरांचे अध्यक्षिय भाषण आहे.सावरकरांसारख्या तेजोगोलावर विस्तृत चरित्र लिहीताना त्यांना आलेले बरेवाईट अनुभव, काहिजणांचे सहय्य तर काहींचा विघ्नसंतोषीपणाचा इतिहास या भषणात मांडला आहे. सावरकर विचारांचे व सावरकर वाड्‌ंमयाचे आजही असलेले महत्व व त्याच्या प्रचारासाठी असलेले उपाय यात सांगितले आहेत. एकंदरीतच ‘तेजोगोल’ हा लेखसंग्रह सावरकरी विचारांशी ओळाख करून घेण्यास सर्व लहानथोरांस उपयुक्त ठरेल.


तेजोगोल: बाळाराव सावरकर
प्र. वीर सावरकर प्रकाशन,मुंबई
पृष्ठे २७२

प्रथम प्रकाशन:

२६ जून १९८८ दैनिक तरुण भारत

No comments: