Thursday 27 August, 2009

भ्रष्टाचारी वृत्तीची कहाणी

भ्रष्टाचारी वृत्तीची कहाणी

श्री. ह.मो.मराठे यांची "मार्केट" ही कादंबरी त्यांनी मालक-कामगार संबंधांवर तसेच औद्योगिक पार्श्वभूमीवर रेखाटली असून त्यातून समाजातील भ्रष्टाचार वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मांडणी
कादंबरीचे कथानक बडया कंपनीमधे मार्केटिंग ऑफीसर असलेल्या सुधाकर केळकर व त्यांच्या कुटुंबियांभोवती फिरत राहते.पैसा हीच निष्ठा असलेल्या केळकरांना अन्य तत्व असे काही नाहीच. उलट आपला कार्यभाग साधण्यासाठी आपल्या सहवासात येणार्या प्रत्येक माणसाला ते पैशाचे तत्वज्ञान सांगून भ्रष्टाचारी व भावनाहीन करुन टाकतात. त्यातून त्यांची पत्नी व मुलगीही सुटत नाही. एकप्रकारे केळकर हे पात्र म्हणजे समाजातील स्वार्थलोलूप भ्रष्टाचारी मंडळींचेच प्रतिक झाले आहे.

कथानक अगदी लहान आहे. कामगारांना बोनस म्हणून अर्धे पैसे रोखीने व उरलेले भेटवस्तूच्या स्वरुपात देण्याची योजना बी.वाय.पी. ही कंपनी आखते. पण भेटवस्तू म्हणून देण्यात आलेल्या सुटकेसेस अतिशय हलक्या दर्जाच्या निघतात. या सुटकेसेस केळकरांच्या कंपनीने तयार केलेल्या असतात. या घटनेचा गवगवा होऊ नये म्हणून केळकर बी.वाय.पी. माणूस विकत घेऊन प्रकरण दाबून टाकतात. यात यश येताच प्रत्येक गोष्टीचे ,अगदी अर्काताच्या नात्यांचेही व्यापारीकरण करुन पैसा मिळवण्याच्या मागे केळकर ही व्यक्ती धावत सुटते.त्यांच्या खेळात त्यांची तरुण मुलगी बळी जाते. पण पैसानिष्ठ केळकर तिच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्यांशीही सौदा करतात.

इंग्रजी शब्दांची बजबजपुरी

कथानकाची मांडणी व सूत्र व्यवस्थित असले तरी कादंबरीची आंग्लाळलेली शाषा अयोग्य वाटते. कादंबरीत वातावरण निर्मितीसाठी व कृत्रिमता येऊ नये म्हणून इंग्रजी शब्द वापरण्याची आता रुढीच होत चालली आहे. पण तरिही कादंबरीत असलेली इंग्रजी शब्द व वाक्यांची बजबजपुरी अजिबात समर्थनीय नाही. कादंबरीच्या कथानकात हा मोठाच अडथळा होऊन बसला आहे.ऑफिसला कार्यालय, फोनला दूरध्वनी अशा प्रतिशब्दांची एकवेळ अपेक्षा नसली तरी- "‘ही टोल्ड की दि होल लॉट इज डिफेक्टिव्ह’- अशा स्वरुपाच्या वाक्यरचना अपेक्षित नव्हत्या. हे वाक्य अपवादात्मक नाही तर सर्व कादंबरीत अशीच भाषा मुक्तहस्ते वापरली गेली आहे. वातावरण निर्मितीसाठी (?) इंग्रजी शब्द वापरणारे लेखक महाशय मुंबईच्या औद्योगिक क्षेत्रात मोठमोठया पदांवर काम करणारे साठे ,पेंडसे ,जोग ,पुराणिक इ.नावांची मराठी माणसे दाखवतात. यात;आ बोल्डर ‘तोडकर’ नावाचा आहे. संपूर्ण कादंबरीत केवळ एक ‘आहुजा’ नावाचा असून तो केळकरांचाच बळी ठरलेला दाखवला आहे.आजची वस्तुस्थिती सर्वजण जाणतात. त्यामुळे ही विसंगती वाचकांना बोचल्याविना राहणार नाही.

समाजातून नष्ट होत जाणारी तत्वनिष्ठ माणसे किती दुबळ्या हातांची ठरत आहेत ते केळकरांच्या सासऱ्यांच्या व्यक्तीरेखेतून पुरेसे स्पष्ट केले गेले आहे. सामाजिक नीतीमूल्यांच्या ऱ्हासाबरोबरच ढासळती लग्नसंस्था व कुटुंबव्यवस्था यांचे चित्रणही लेखकाने यशस्वीपणे केले आहे. एकूण भाषाशुद्धता व तपशील यांचे दोष वगळता कादंबरी वाचनीय आहे असे म्हणता येईल.

मार्केट: ह.मो.मराठे
प्र.मॅजेस्टिक प्रकाशन,गिरगाव,मुंबई-४
पृष्ठे २०९

प्रथम प्रकाशन:

दै. तरुण भारत ४ सप्टेंबर १९८८

1 comment:

suraj mahajan said...

Jwalant-hindutw.blogspot.com/